लहानपणापासून जयंताला आई, आजीकडुन गोष्टी ऐकण्याचा फार नाद असे. एकतरी गोष्ट ऐकल्याशिवाय त्याला चैनच पडत नसे. मग त्या बिचा-या रामायण, महाभारत, पुराणे, राजाराणी, परीकथा आठवतील त्या गोष्टी सांगत असत. जयंताला ते सारे खरे वाटत असे.
बालवाडी, प्राथमिक , शाळा संपेपर्येंत तो गोष्टी ऐकायचा. जरा मोठा झाल्यानंतर तो स्वतः तशाच गोष्टी हुडकुन आणून वाचू लागला. सगळ्या गोष्टींचा मतीतार्थ तुम्ही चांगले वागलात की सगळे चांगले वागतात. देव प्रसन्न होतो. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो तुम्हाला भेटल्याशिवाय रहात नाही. या तात्पर्याबाबत मात्र जयंताचे आणि त्यांचे एकमत होत नव्हते.
शाळा, काॕलज वगैरे टप्पे व्यवस्थित सुरु हौते. जयंता इतर मुलांपेक्षा जरा जास्तच हुशार, एकपाठी असा होता. त्यामुळे वर्षाभर सतत तीच पुस्तके वाचत राहणे त्याला आवडायचे नाही.
त्याचे वडिल फाॕरेस्ट आॕफीसर होते. आई गृहीणीच होती. आजी त्यांच्याकडे असल्यामुळे, ते तिघे गावात रहात. कधीकधी जयंताचे बाबा त्याला जंगलात नेत.
जंगलात बाबा त्याला थोडे फिरवून आणत. पक्षी, प्राणी दिसत, टि.व्ही. मोबाईल नसताही वेळ चांगला जात असे. निसर्गाचे जिवंत दर्शन त्याला आवडत असे.
गावात येणारे व्याख्याते त्याला भुरळ घालत असत. आता प्रवचने , धार्मिक वक्तेही त्याला आवडू लागले होते. व्याख्यान संपल्यानंतर तो त्यांच्याशी बोलत असे. शंका विचारत असे. “तुम्ही हे सगळे देवाचे सांगता त्याचा तुम्हाला अनुभव आला आहे का? ” असा त्याचा नेहमीचा प्रश्न असे. ते त्याला त्यासाठी साधना केली पाहिजे वगैरे सांगत. काही साधना करायला सांगत.
तो तसे करत असे. तरीही काही प्रत्यय येत नसे. अचानक एके दिवशी आपल्या मनातल्या सर्व इच्छा बाजुला ठेवल्या, व दुस-याच्या मनाचा विचार केला, तर त्यांचे मन समजू शकते असे त्याला जाणवू लागले. त्यावरुन त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही त्याला देता येवू लागली. ते खरेही ठरु लागले. लोक त्याला भेटायला येऊ लागले. पण तेव्हढेच.
तो असाच इकडेतिकडे फिरु लागला. त्याला अवलीया हे नाव पडले. पण त्याचेही त्याला काही वाटेनासे झाले.
एकदा रात्री फिरताना एका सुनसान रस्त्यावर मनातील इच्छा काढून टाकताच, एक माकडासारखा आकार सतत रस्त्याच्या एका बिंदूपर्येत जाऊन थांबून परत येत असल्याचे त्याला जाणवले. अजुन जवळ जाताच ते माकड नसून एक मुलगा आहे असे त्यास दिसले. आकार अस्पष्ट होता.
“बाबा, मला पलीकडे सोडा.” असे शब्द जाणवले. त्याने त्याचा हात धरुन त्याला पलीकडे सोडले. लगेच तो मुलगा त्याच्या पाया पडला. “हे काय ?” त्याने विचारले. ” अहो मला पलिकडे जायचे होते. बस आली, माझ्या अंगावरुन गेली. तुम्ही मला सोडवले.” म्हणजे काय त्याने विचारले. “अहो माझी तेव्हढीच ईच्छा होती. ” मरताना शेवटची अशी कणभरच ईच्छा असते. तेव्हढी तुम्ही सोडवली. माझे काम झाले. ” मग ती तुमची तुम्हाला पूर्ण करता येत नाही?” “नाहीना, त्यासाठी तुमच्यासारखे कोणीतरी लागते.” तो म्हणाला.
“पण तू तर येव्हढासा. तुला हे सगळे कसे कळते?” ” ते होय. ऐकून ऐकून मला सगळे समजते. तुम्ही मदत कराल का अशांना?” “येव्हढेच होय करीन की. ” जयंता बोलला.
झाले. आता जयंताचा तो उद्योगच झाला. रात्री तो त्या रस्त्यावर जाई. तो मुलगा त्याला वेगळेवेगळ्या ठिकाणी घेऊन जाई. तेथे पोचताच ते आकार दिसू लागत.
कोणाला मुलाचा चेहरा पाहायचा असे. कोणाला काही वस्तू हवी असे. रात्रीत अशा पन्नास शंभर जीवांची कामे तो सहज करत असे. त्यांच्याबरोबर कोठेही क्षणात जाता येई.
एकदा एका म्हाताऱ्याला रस्ता दाखवताना एकदम काहीतरी चमकले. म्हातारा पळून गेला. चमक संपल्यावर परत म्हातारा दिसू लागला. ” काय होते ते?” जयंताने विचारले. ” ते देवकण असतात. ” त्याने सहज उत्तर दिले.
आता त्यातील काही आकार दिवसाही त्याच्या जवळ असल्याचे त्याला जाणवू लागले. लोकांचे प्रश्न, शंका आता ते आकारच सोडवू लागले. जयंताला त्यासाठी प्रयत्नच करण्याची आवश्यकता पडेना.
नेहमीप्रमाणे रात्रीचा फेरफटका मारताना प्रकाशाची तिरीप दिसू लागली. ” तू त्यांची कामे करतोस. पण असे किती करशील. असे आत्मे कोट्यावधी आहेत. तुझे आयुष्य संपून जाईल. ” प्रकाशातुन शब्द जाणवले.”पण त्यांच्यामुळे मला अनुभव तर आला. त्यांची छोटीछोटी कामेही झाली. ”
प्रकाशातुन शब्द आले, ” ते करण्यासाठी त्यांचे मार्ग आहेत. तुला शेवटी यातून छोटीमोठी बक्षीसे मिळतील बस्स. काही त्रासही होऊ शकतो.” मग मी करु तरी काय? तुमचे तर काहीच अनुभव येत नाहीत. ”
” अरे वेड्या. आत्ता तू मार्गाला आलास. अशीच कामे जिवंत लोकांसाठी कर. आम्ही आहोतच तुझ्याबरोबर. ” प्रकाश विरुन गेला.
त्या क्षणापासुन जयंता बदललाच. आता घरदार त्याला बांधून ठेवू शकले नाही. तो सतत देशभर हिंडू लागला. माणसांनी प्रश्न विचारताच तो त्यांना नाऊमेद न होता आणखी एक प्रयत्न करायला सांगू लागला. आणि तो खराखूरा अवलीया झाला.
मुकुंद दात्ये ..